संगमनेर : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क
संगमनेर शहरात जय मल्हार क्रांती संघटना आणि शिवसेना महायुती संगमनेर यांच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी समाजबांधवांशी मनमोकळा संवाद साधत राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य आणि स्वाभिमानपूर्ण कार्याला अभिवादन केले.

या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की,“राजे उमाजी नाईक यांच्या स्मृतीतून समाजहितासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा सतत मिळते. स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी त्यांनी केलेले पराक्रम व बलिदान आजही प्रत्येक पिढीला संघर्षाची प्रेरणा देतात. त्यांच्या क्रांतिकारी विचारांतून आपल्याला राष्ट्रनिष्ठेचा आणि त्यागभावनेचा धडा मिळतो.”
जयंती उत्सवात शहर व तालुक्यातील विविध मान्यवर, समाजबांधव व युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी उमाजी नाईक यांच्या प्रेरणादायी कार्यातून समाजात ऐक्य, शौर्य आणि स्वाभिमान जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
