बालपण स्कूल पानोडी व आश्वीच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक, फटाके-मुक्त दिवाळीचा संदेश!

“आम्ही फटाके वाजवणार नाही — निसर्ग आणि पर्यावरण वाचवणार” असा निर्धार चिमुकल्यांचा!

आश्वी बुद्रूक (पानोडी) : निर्भीड जनता न्यूज नेटवर्क

बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पानोडी व आश्वीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षेच्या शेवटच्या दिवशी पारंपारिक उत्साहात, पण पर्यावरणपूरक पद्धतीने फटाके-मुक्त दिवाळी साजरी करत एक आदर्श निर्माण केला आहे.शाळेच्या दोन्ही कॅम्पसवर पारंपारिक पोशाख, गायपूजन, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, दीपोत्सव यांसारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीची मांडणी करत “आनंदात पण जबाबदारीने दिवाळी साजरी करूया” असा संदेश दिला.

यानंतर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या धान्याचे पूजन करत पारंपारिक पद्धतीने धनत्रयोदशीचा उत्सव साजरा केला. शेतकऱ्यांच्या श्रमाला नमस्कार करत, “शेतीतूनच लक्ष्मी येते” हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.या उपक्रमातून बालकांनी ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकरी आणि परिश्रम यांचे महत्त्व समजून घेतले.

विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात पानं-फुलं आणि नैसर्गिक सजावटीचा वापर करून सुंदर लक्ष्मीपूजनाचा मंडप उभारला.विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाखात माता लक्ष्मी, भगवान कुबेर आणि श्री गणेश यांची पूजा केली.“फुलांचा वापर, टाकाऊ वस्तूंमधून सजावट आणि स्वच्छतेचा संदेश” या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला.

मुलींनी आपल्या वर्गातील भावांना आरती ओवाळून भाऊबीज साजरी केली. प्रेम, आदर आणि भावनिक बंध यांचा हा सण शाळेच्या वातावरणात साजरा होत असताना, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.शाळेच्या वातावरणात “भाऊबीजच्या शुभेच्छा” या गाण्यांनी आणि ओवाळणीच्या गीतांनी एक पारंपारिक व घरगुती वातावरण निर्माण झाले.

विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरकतेचा संदेश देत टाकाऊ वस्तूंपासून दिवे, आकाशकंदील आणि सजावटीच्या वस्तू तयार केल्या. या वस्तूंनी संपूर्ण वर्ग आणि शाळा उजळून निघाली.“टाकाऊतून टिकाऊ” हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कृतीतून दाखवला.

उत्सवाच्या अखेरीस सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हात उंचावून फटाके-मुक्त दिवाळीची शपथ घेतली.“आम्ही फटाके वाजवणार नाही, पर्यावरण वाचवू आणि आवाज-मुक्त दिवाळी साजरी करू” असा निर्धार करत विद्यार्थ्यांनी समाजालाही पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

या उपक्रमात पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.या उपक्रमामागील संकल्पना बालपण स्कूलच्या प्रमुख सौ. सोनाली मुंडे यांच्या मार्गदर्शनातून साकारली.त्यांच्या पुढाकाराने हा “फटाके-मुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी उत्सव” यशस्वीपणे पार पडला.

या संपूर्ण उपक्रमातून बालपण स्कूल पानोडी व आश्वीच्या विद्यार्थ्यांनी समाजात एक वेगळा संदेश दिला —“दिवाळी म्हणजे फटाके नव्हे, तर दिवे, संस्कार आणि निसर्गप्रेमाचा उत्सव.”या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता वाढवण्यासोबतच संस्कृतीची जाण आणि सामाजिक जबाबदारी विकसित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!